कविता -निसर्ग
मी गच्चीत उभी होते, एकटक बघत आणि शांत... चहूबाजूंनी असलेला निसर्ग मला मोहवत होता तरीही मी तशीच उभी होते! इतक्या रंगछटा बघून मन सुखावून गेलेले पण आपल्याला सगळे दुरूनच बघावे लागत असल्याने मन खट्टू झालेले. ते सौंदर्य पाहून आठवले पन्हाळगड ते विशाळगड ट्रेकमध्ये मध्ये लागलेले डोंगर धबधबे, रायरेश्वरला अनुभवलेला शिळंधार पाऊस, राजगडावरील निसरडी वाट आणि अशा किती किती गोष्टी मनात डोकावून गेल्या. तेव्हा अचानक जाणीव झाले की असंख्य सुंदर रंगांनी बनलेला असा हा निसर्ग आहे. तनामनाला शीतलता देणारा निळसर जलदातून पडणारा पाऊस, डोळ्यांना सुखावणारा सृजनाचा हिरवा रंग, धरणीकडे झेपावणाऱ्या धबधब्याचा शुभ्रपांढरा रंग आणि विविधरंगी फुलांची तर कथाच न्यारी! या सर्वांनी भरून गेलेला असा हा ओला निसर्ग.....
गडद निळे जल आले
डोंगर दरी दगड न्हाले
भरलेल्या आभाळावर
मोर थुईथुई नाचले
हिरव्या पर्वतरांगा
हिरवे धरणीतले बीज
हिरवे मन माझेही
झाले विपुल आनंदे
खडकाला झरे फुटले
दुग्धापरि शुभ्र रे
मनपटलवरचे सारे
दुःख दोष मिटले रे
सजले रे रंग माझे
निसर्गासम सुंदरसे
वेचू नितळ सौंदर्यात
आयुष्याचे कवडसे....
- सई वैभव जोशी
. इयत्ता १० वी
Comments
Post a Comment